मालवण : ‘महाराष्ट्रात सर्व क्षेत्रांत मराठी सक्तीची झालीच पाहिजे,’ या आंदोलनाला कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने एकमुखी पाठिंबा व्यक्त केला आहे. २४ जून २०१९ रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे २४ मराठी संस्थांच्या वतीने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या यांच्या नेतृत्वाखाली आणि पद्मश्री मधू मंगेश कर्णिक आणि लक्ष्मणराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन छेडण्यात आले.
तत्पूर्वी २३ जूनला कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेची सभा सुरेश ठाकूर (अध्यक्ष, कोमसाप, मालवण) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी रुजारिओ पिंटो (केंद्रीय सल्लागार समिती सदस्य, कोमसाप), रवींद्र वराडकर, अजय मुणगेकर, रामचंद्र आंगणे, ‘कोमसाप’चे सचिव अनिरुद्ध आचरेकर आणि ‘कोमसाप’चे ८० सदस्य उपस्थित होते.
‘कोमसाप’च्या मालवण शाखेच्या वतीने वर्षभर आयोजित करावयाच्या विविध कार्यक्रमांचे नियोजन या सभेत करण्यात आले. ‘पाऊस शब्दसुरांचा’, ‘आमच्या कविता कवितेच्या राजधानीत’, ‘जाऊ कवींच्या गावा’ इत्यादी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. या वेळी कल्पना मलये, सदानंद कांबळी, चंद्रशेखर हडप, उज्ज्वला धानजी, रवींद्र वराडकर, रामचंद्र आंगणे यांनी ‘कोमसाप’च्या वर्षभरातील विविध उपक्रमांबद्दल आपली मनोगते व्यक्त केली.